चंद्रपूर: आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी अवैध गोवंश तस्करी आणि बेकायदेशीर कत्तलींविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. गेल्या पाच वर्षांत गोवंश तस्करीचे गुन्हे दाखल असलेल्या आरोपींवर पोलिसांनी आता पूर्णपणे कडक कचाटा आवळला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या थेट सूचनेवरून, शनिवारी २३ मे रोजी पोलीस मुख्यालयात गोवंश तस्करी आणि अवैध कत्तल प्रकरणातील आरोपींची एक 'विशेष परेड' आयोजित करण्यात आली होती. या परेडसाठी जिल्ह्यातील तब्बल २७५ आरोपींना पोलीस लाईनमध्ये उपस्थित करण्यात आले होते. (बादल हरणे टोळी वर्षभरासाठी हद्दपार)
पोलीस प्रशासनाने या सर्व आरोपींवर नवीन कायदेशीर तरतुदींनुसार, कलम १२६ आणि १२९ अंतर्गत चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र (बॉण्ड) घेण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी आरोपींना कडक शब्दांत चेतावणी दिली की, "जर कोणत्याही आरोपीने या बंधपत्रातील अटी व शर्तींचे उल्लंघन केले, तर त्याच्यावर मोठ्या आर्थिक दंडासह थेट तुरुंगात पाठवण्याची अत्यंत कठोर कारवाई केली जाईल."
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत गोवंश तस्करी आणि अवैध कत्तलीशी संबंधित सुमारे ३५० हून अधिक आरोपींवर विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी २७५ आरोपी आजच्या या विशेष परेडला हजर होते. उर्वरित काही आरोपी इतर जिल्ह्यांत किंवा परराज्यांत राहत असल्याने आज उपस्थित राहू शकले नाहीत; मात्र अशा अनुपस्थित आरोपींवरही पोलिसांची कारवाई सातत्याने सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
बकरी ईदच्या काळात जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अवैध कृत्य किंवा शांतता भंग होऊ नये, यासाठी जिल्हा पोलिसांनी व्यापक आणि चोख सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, जिल्ह्याच्या आंतरराज्यीय आणि आंतरजिल्हा सीमांसह एकूण ३४ संवेदनशील ठिकाणी कडक नाकाबंदी करण्यात आली आहे. या सर्व तपासणी नाक्यांवरून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून चौकशी व तपासणी केली जात आहे.
जिल्हा प्रशासन, पशुसंवर्धन विभाग आणि पोलीस विभाग यांच्या संयुक्त समन्वयाने सुरू असलेल्या या धडक मोहिमेमुळे अवैध गोवंश तस्करीच्या संपूर्ण नेटवर्कला मोठा हादरा बसला आहे. "धार्मिक सणाची आड घेऊन बेकायदेशीर कृत्ये करणाऱ्यांची गय केली जाणार नाही आणि जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल," असा स्पष्ट संदेश पोलीस अधीक्षकांनी दिला आहे.
Leave a Comment