Chandrapur Politics News : चंद्रपूर - महानगरपालिकेतील सभागृह नेतेपदाच्या निवडीवरून राजकीय वातावरण तापले असून महापौरांच्या निर्णयाविरोधात नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 32 पैकी 27 नगरसेवकांनी सभागृह नेतेपदासाठी सुचविलेल्या नावाला बगल देत महापौरांनी जयश्री जुमडे यांच्या नावाची घोषणा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या निर्णयामुळे नगरसेवकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. (नगरसेवकांना बनविले एप्रिल फुल)
यावेळी नगर सेवक सुभाष कासनगोट्टूवार, शेखर शेट्टी, नगर सेविका सविता कांबळे, नगर सेवक संजय कंचर्लावार, सरला कुळसंगे, अनुजा तायडे, पुष्पा उराडे, नितेश गवळी, जितेश कुळमेथे, आशा देशमूख, सारिका संदुरकर, रॉबिन बिश्वास, राललक्ष्मी कारगंल, डिलन केळझरकर, भालचंद्र दाणव, शितल गुरुनुले, ज्योती जिवने आदिंची उपस्थिती होती.
या पार्श्वभूमीवर सर्व नगरसेवकांनी मंगळवारी महापौर यांच्या घरी भेट घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर महापौरांनी बुधवारी दुपारी 12 वाजता महानगरपालिकेत बैठक बोलावून चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ठरलेल्या वेळेनुसार सर्व नगरसेवक पालिकेत उपस्थित राहूनही महापौर गैरहजर राहिल्या. दुपारी 5 वाजेपर्यंत प्रतीक्षा करूनही त्या न आल्याने संतप्त नगरसेवकांनी महापौरांच्या कार्यालयात “बेईमानी करणाऱ्या महापौर” अशा आशयाचे फलक लावून निषेध नोंदविला.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे माजी महानगराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, भाजपचे 17 नगरसेवक आणि सहयोगी पक्षांचे नगरसेवक मिळून एकूण 27 नगरसेवकांनी एकमताने शेखर शेट्टी यांची सभागृह नेतेपदी निवड करण्यास सहमती दर्शविली होती. याबाबत शिवसेना उबाटा गटाचे गट नेते राहुल विरुटकर यांनी ठरावही मंजूर केला होता. असे असताना महापौरांनी दुसऱ्या उमेदवाराचे नाव जाहीर करून बहुमताचा व नगरसेवकांच्या भावनांचा अनादर केला असल्याचा आरोप त्यांनी केला. Chandrapur Municipal Corporation
तसेच, स्थायी समिती सभापती पदासाठी महापौरांच्या गटातील दोन नावे सुचविणे, महिला व बालकल्याण समितीसाठी त्यांच्या गटाच्या नगरसेवकाला पाठिंबा देणे, अशा प्रकारे पक्ष एकजुटीचा सातत्याने प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, महापौरांच्या भूमिकेमुळे पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न होत असून तो पक्षासाठी घातक ठरू शकतो, असेही कासनगोट्टूवार यांनी स्पष्ट केले.दरम्यान, या प्रकरणामुळे महानगरपालिकेतील राजकीय घडामोडींना वेग आला असून पुढील काळात यावर कोणता तोडगा निघतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Leave a Comment