Jal Jeevan Mission । भर उन्हाळ्यात पाणी टंचाई भासणार नाही! मुनगंटीवारांनी आखला १० हून अधिक गावांचा मास्टर प्लॅन

March 31, 2026 by Prakash Hande

Jal Jeevan Mission Maharashtra : चंद्रपूर - सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी कायम संवेदनशील असलेले नेते राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा पिण्याच्या पाण्याच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नावर ठाम भूमिका मांडली. ऑडिओ ब्रिज ‘संवाद सेतू’च्या माध्यमातून भाजपा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी ग्रामीण भागातील जलजीवन मिशनच्या अपूर्ण योजनांमुळे सामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणींवर तीव्र चिंता व्यक्त केली. “उन्हाळ्याची सुरुवात झाली असून, पिण्याच्या पाण्याची टंचाई भासायला नको. पाणी हा नागरिकांचा मुलभूत अधिकार आहे. त्यामुळे प्रत्येकापर्यंत पाणी पोहोचलेच पाहिजे,” असे ठामपणे सांगत आ. श्री. मुनगंटीवार यांनी या विषयाकडे तातडीने लक्ष देण्यासाठी विशेष भर दिला. (महापौर व उपमहापौर यांच्या प्रभागात पराभूत उमेदवार करतोय विकास)



या ऑडिओ संवाद सेतूमध्ये भाजपा जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा, संघटन प्रभारी राम लाखिया आणि सर्व मंडळ अध्यक्ष उपस्थित होते. पाईपलाईन टाकण्यासाठी खोदलेले रस्ते तसेच विजेचे बिल न भरल्यामुळे योजना बंद पडणे, लिकेजमुळे पाणीपुरवठा खंडित होणे, ग्रामपंचायतींकडे देखभाल-दुरुस्तीचा निधी नसणे, तसेच काही ठिकाणी आरओ यंत्रणा बसवूनही योग्य मेंटेनन्स न होणे या सर्व कारणांमुळे गरीब, शेतकरी, शेतमजूर आणि वंचित कुटुंबांना शुद्ध पिण्याच्या पाण्यापासून वंचित रहावे लागू नये, यासाठी मंडळ अध्यक्षांनी प्रत्येक तालुक्यात दौरे करून प्रत्यक्ष गावागावात जाऊन पाणीपुरवठ्याची स्थिती जाणून घ्यावी. त्यातील अडचणी समजून घेत त्या नोंद करण्याच्या सूचना आ. मुनगंटीवार यांनी बैठकीत दिल्या.



“पाणी ही केवळ सुविधा नाही, तर जीवनाचा मूलभूत हक्क आहे. पाणीपुरवठा सुरळीत ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. हे ईश्वरीय कार्य करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा,” असे भावनिक आवाहन करत त्यांनी प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या गावात, आपल्या तालुक्यात जाऊन प्रत्यक्ष परिस्थिती तपासावी, समस्या ओळखाव्यात आणि त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावे, असे स्पष्ट निर्देश दिले.

बोर चांदली, येरगाव, दुर्गापूर, कोठारी, घनोट्टी तुकूम, बोर्डा झुल्लूरवार, भीमनी, बेंबाळ, जुनासुर्ला आदी गावांतील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांकडे विशेष लक्ष देण्याचे सांगत, आवश्यक ठिकाणी बैठका घेऊन तातडीने उपाययोजना निश्चित करण्यावर त्यांनी भर दिला. सार्वजनिक मालमत्ता ही समाजाची संपत्ती आहे, ती दुर्लक्षित राहू नये, असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना प्रत्येक योजनेची माहिती गोळा करून अडचणींची सविस्तर यादी तयार करून देण्याचे आवाहन आ.मुनगंटीवार यांनी केले. Amrut 2.0 Mission



लवकरच, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत विस्तृत बैठक घेऊन या योजना लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती आ. मुनगंटीवार यांनी दिली. विहीर, हातपंप आणि नळ योजना यांसारख्या सर्व घटकांवर लक्ष केंद्रित करून ग्रामीण भागातील पाणीपुरवठा मजबूत करण्यासाठी राज्य सरकारकडून आवश्यक निधी आणण्याचे ठोस आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

याचबरोबर, नुकतेच केंद्र शासनाच्या अमृत २.० अभियानांतर्गत पोंभुर्णा नगरपंचायतसाठी मंजूर झालेल्या तब्बल ४०.८४ कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा प्रकल्पाचा उल्लेख केला. पाण्याच्या प्रश्नामुळे जनतेला भेडसावणाऱ्या अडचणी आता दूर होणार असून, शहराच्या, गावाच्या दीर्घकालीन पाणी समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी निश्चित पूर्ण शक्तीने प्रयत्न करू, असा विश्वास आ. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी या अभियानात जीव ओतून काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Leave a Comment

+