Tiger Attack Maharashtra News : नागभीड : चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीवसंघर्षाच्या घटनेत वाढ होत असताना दिसत आहे, ४ एप्रिल रोजी नागभी तालुक्यातील शेतकरी सकाळच्या सुमारास मोहफुले वेचण्यासाठी गेला मात्र तो परतला नाही, दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी त्या शेतकऱ्याच्या छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला. वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले असून आतापर्यंत वाघ व बिबट्याच्या हल्ल्यात एकूण १२ जणांचा बळी गेला आहे. (नियम मोडले, भाजप आमदाराला दंड)
५८ वर्षीय हरिदास महादेव कुबडे हे शेतकरी शनिवारी सकाळीच शेतात मोहफुले वेचण्यासाठी गेले होते, सायंकाळ पर्यंत कुबडे घरी न पोहोचल्याने कुटुंबाने त्यांचा गावकऱ्यांच्या मदतीने शोध सुरु केला मात्र ते कुठेही आढळून आले नाही, याबाबत वनविभाग व पोलीस विभागाला माहिती देण्यात आली, शेत परिसरात कुबडे यांचा शोध घेतला मात्र त्यांचा थांगपत्ता लागला नाही, सायंकाळी ६ वाजता कुबडे यांचा पुतण्या शेतात गेला असता त्याठिकाणी त्याला वाघाची जोडी आणि ३ बछडे दिसल्याने तो घरी परतला, परिसरात आधीच वाघाचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले.
रविवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम राबवली असता शेत परिसरातील नाल्याजवळ हरिदास कुबडे यांचा मृतदेह आढळून आला, वनविभागाने घटनेचा पंचनामा करीत मृतकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत प्रदान केली. गावकर्यांनी वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी केली.
Leave a Comment