चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात ९ मे २०२६ रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे पोंभूर्णा आणि मुल तालुक्यातील मका, मिरची, भाजीपाला तसेच इतर हंगामी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, संकटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळावा यासाठी राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पत्र पाठवून नुकसानग्रस्त पिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरीत नुकसान भरपाई देण्याची मागणी आ. मुनगंटीवार यांनी केली आहे. (चंद्रपूरातून थेट मुंबई, ताडोबा एक्सप्रेस धावणार)
मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात आ. मुनगंटीवार यांनी नमूद केले आहे की, अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचा काढून ठेवलेला मका भिजून खराब झाला असून अनेक ठिकाणी उभे पीक जमीनदोस्त झाले आहे. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे संकट कोसळले आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आ.मुनगंटीवार यांनी केली आहे.
तसेच ज्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्या भागांसाठी विशेष मदत जाहीर करण्यात यावी, अशीही मागणी आ. मुनगंटीवार यांनी केली आहे. शेतकरी संकटात असताना शासन आणि प्रशासनाने संवेदनशीलतेने उभे राहणे आवश्यक असल्याची भूमिका त्यांनी मांडली.
दरम्यान, आ. मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांच्यासोबत दूरध्वनीद्वारे चर्चा करून मक्का,मिरची, भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याचे तसेच शासनाकडे नुकसान भरपाईसाठी सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. शेतकऱ्यांना लवकरात लवकर दिलासा मिळावा यासाठी प्रशासनाने तत्परतेने कार्यवाही करावी, असेही आ.मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.
Leave a Comment