चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच वाढत्या अपघाताला प्रतिबंध घालण्यासाठी पोलिस विभागाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशा सूचना राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी नूतन जिल्हा पोलिस अधिक्षक आयुश नोपानी यांना दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, मनपा आयुक्त अकुनुरी नरेश आदी उपस्थित होते. (७ वर्षे उपचार केला आणि उचलले टोकाचे पाऊल)
चंद्रपूरमध्ये अवैध धंदे व गुंडागर्दी खपवून घेतल्या जाणार नाही. कायदा व सुव्यवस्था मोडणाऱ्या नागरिकांवर त्वरित पोलिस विभागाने कारवाई करावी. याबाबत कोणतीही हयगय करू नये. चंद्रपूर शहरात गत तीन-चार दिवसात मोठ्या प्रमाणात अपघात होऊन नागरिकांचा बळी गेला आहे, हे अतिशय दुर्दैवी आहे. शहरातून जड वाहनांची अनिर्बंध पद्धतीने वाहतूक होत असल्यास तात्काळ त्यावर कारवाई करावी, अशा सुचना पालकमंत्री डॉ. वुईके यांनी दिल्या.
मागील वर्षभरापासून चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारीने डोकं वर काढलं आहे, मात्र वर्षभरानंतर का होईना पालकमंत्री वुईके यांना कायदा व सुव्यवस्थेची आठवण अखेर झालीच, नव्या पोलीस अधीक्षकांकडून नागरिकांना अनेक अपेक्षा आहेत, अंमली पदार्थाची तस्करी थांबवित भावी पिढीला या जीवघेण्या व्यसनातून वाचविणे, वाळू माफिया, गुन्हेगारी प्रवृत्तीला ठेचून काढणे असे अनेक आव्हान पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्यासमोर आहे.
Leave a Comment