गोवरी (जि. चंद्रपूर) : मासे पकडण्याच्या नादात जीवाची जोखीम पत्करणे एका तरुण मजुराच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना राजुरा तालुक्यातील गोवरी येथे घडली आहे. नाल्यातील पाण्यात विद्युत करंट सोडून मासे पकडत असताना विजेचा तीव्र धक्का लागल्याने एका ३० वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. कैलास देवराव धाडसे असे मृत युवकाचे नाव असून, तो गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथील रहिवासी होता. ही दुर्दैवी घटना गुरुवारी सायंकाळी ४:३० वाजताच्या सुमारास घडली. (अपघातावरून संताप, वाहतूक पोलीस निरीक्षकाची बदली करा)
मिळालेल्या माहितीनुसार, कैलास धाडसे हा मूळचा गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथील रहिवासी होता. गावाकडे हाताला काम नसल्याने तो रोजगाराच्या शोधात गुरुवारी सकाळीच राजुरा तालुक्यातील गोवरी येथे आला होता. नव्या ठिकाणी कामाची सोय होईल आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करता येईल, अशी आशा त्याला होती. मात्र, गोवरी येथे पोहोचल्यानंतर काही तासांतच त्याच्यावर काळाने घाला घातला.
सायंकाळच्या सुमारास कैलास गावाजवळ असलेल्या एका नाल्यावर मासे पकडण्यासाठी गेला होता. मासे पकडण्यासाठी त्याने सोपा पण जीवघेणा मार्ग निवडला. त्याने नाल्यातील पाण्यात विद्युत करंट सोडला. पाण्यात करंट पसरलेला असताना मासे पकडण्याच्या प्रयत्नात त्याचा पाण्याचा स्पर्श झाला आणि त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. हा धक्का इतका तीव्र होता की, कैलासचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी नाल्याकडे धाव घेतली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. या घटनेमुळे गोवरी परिसरात मोठी खळबळ उडाली असून, रोजगारासाठी आलेल्या तरुणाचा अशा प्रकारे अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास राजुरा पोलीस करत आहेत.
अशा प्रकारे विद्युत प्रवाहाचा वापर करून मासेमारी करणे कायद्याने गुन्हा असून ते अत्यंत जीवघेणे ठरू शकते, असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार केले जाते. मात्र, तरीही अशा घटना घडत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.
Leave a Comment